शुभमन गिल, जिद्द आणि इतिहास!!

शुभमन गिल, जिद्द आणि इतिहास!!
"इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत नाही, पण तो त्यासारखा वाटतो."― मार्क ट्वेन
"आपण जे निर्माण करतो त्यापेक्षा आपण जे नष्ट करतो त्यासाठी आपली जास्त आठवण ठेवली जाईल."― चक पॅलानिक
"महान क्रिकेटपटू विराट कोहली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते क्रिकेटमध्ये उत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी ते 'सुधारणा' या संकल्पनेवर विश्वास ठेवतात – म्हणजे दररोज (प्रत्येक सामन्यात) आपल्या पूर्वीच्या स्वरूपापेक्षा अधिक चांगले होणे."
मार्क ट्वेन, संपूर्ण साहित्याच्या इतिहासातील कदाचित टॉप दहा लेखकांपैकी एक. तर चक पॅलानिक, अमेरिकेतील नव्या युगातील कल्पनारम्य साहित्य लिहिणारा लेखक. आणि विराट कोहली? बरं, जर त्याचं नाव माहीत नसेल, तर मी नेहमी म्हणतो तसं (वैधानिक इशारा) तुम्ही इथेच वाचणं थांबवू शकता, कारण ही गोष्ट आहे क्रिकेटबद्दल (पुन्हा एकदा)! खूप क्वचित असं घडतं की मी एका आठवड्यात दोनदा एकाच विषयावर लिहितो, आणि तो विषय ताडोबा नाही (उपहास समजावं!) तर क्रिकेट आहे, आणि तेही खूप आनंदाने लिहितोय. त्यामुळे टीम इंडियाचे मनःपूर्वक आभार, की त्यांनी आपल्या खेळातून इतिहास निर्माण करण्याची, किंबहुना इतिहास पुन्हा लिहिण्याची परंपरा कायम ठेवली! थोडक्यात विषयाची आठवण करून द्यायची झाल्यास — भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी आहे. पहिल्याच टेस्ट सामन्यात आपल्या कामगिरीमुळे आपण दोन्ही अर्थांनी (चांगल्या आणि वाईट) इतिहास रचला — कारण ती टेस्ट आपण गमावली. आणि त्यानंतर सुरू झालेला हा सध्याचा सामना (जो अजूनही सुरू आहे — पाचवा दिवस चालू आहे) तिथूनच पुढे सुरू झाला आहे. जेव्हा मी लिहायला सुरुवात केली, तेव्हाच क्रिकेट या खेळाच्या इतिहासात काही नवीन पानं भरली गेली होती — आणि यावेळी ती कामगिरी अक्षरशः एकट्याने करणारा एकच माणूस होता (हाच आहे या लेखनाचा विषय) — आपला कर्णधार शुभमन गिल! कदाचित तुम्ही विचार करत असाल (आणि या खेळाचे काही द्वेष्टे तर कपाळावर आठ्या घेऊनच) — की अशा एका खेळाबद्दल इतका वेळ देऊन लिहिण्याचं (आणि मग ते वाचायला लावण्याचं) काय इतकं महत्त्व आहे, जो फक्त पंधरा देशांमध्ये खेळला जातो? आणि त्याच देशात सध्या विम्बल्डनसारखी स्पर्धा सुरू आहे, ज्यातला टेनिस हा खेळ क्रिकेटच्या तुलनेत जवळपास दहा पट अधिक देशांमध्ये खेळला जातो! तर दोन गोष्टी आहेत (टेनिसबाबत कोणतीही तुलना नाही) पहिली म्हणजे, क्रिकेट हा खेळ एकाच वेळी बावीस खेळाडूंनी मिळून खेळला जातो, आणि कोणतीही कामगिरी ही वैयक्तिक प्रयत्नांची आणि संघाच्या पाठिंब्याची सांगड असते. दुसरी गोष्ट म्हणजे, टेनिसच्या तुलनेत क्रिकेट अगदी कमी साधनसंपत्तीमध्ये आणि कुठेही खेळता येतो, जे आपल्या गरीब देशासाठी एक वरदान आहे! म्हणूनच, क्रिकेट हा खऱ्या अर्थाने लोकांचा खेळ आहे, आणि हे क्रिकेटचा द्वेष करणाऱ्यांनाही मान्य करावंच लागतं. आणि शेवटी आपल्याला सगळ्यांनाच आपला आयुष्याचा खेळ खेळायचा असतो, तो घरी असो किंवा ऑफिसमध्ये (कामावर), तो बहुतेक वेळा टीम फॉरमॅटमध्येच असतो. त्यामुळे अशा खेळांतून आपण जे काही शिकतो, ते आपल्या स्वतःच्या खेळात, म्हणजेच आयुष्यात, अधिक चांगलं कामगिरी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतं, हेच माझं लॉजिक आहे!
ठीक आहे, तात्पुरता तत्वज्ञानाचा भाग इथेच संपवूया. आता आपल्या आजच्या चर्चेच्या नायकाकडे येऊया आणि गेल्या चार दिवसांत त्याने कर्णधार म्हणून आणि वैयक्तिकरित्या केलेल्या ऐतिहासिक कामगिरी किंवा विक्रमांवर एक नजर टाकूया. यापैकी अनेक गोष्टी तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या असतीलच, पण फक्त तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी. गिलने आपल्या दोनही डावांत जबरदस्त कामगिरी करत पहिल्या डावात २६९ धावा आणि दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या, म्हणजे एकाच टेस्ट सामन्यात तब्बल ४३० धावा! ही कामगिरी केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात अनेक पातळ्यांवर विक्रमी ठरते, आणि लक्षात ठेवा, हा इतिहास तब्बल १४० वर्षांहून अधिक जुना आहे! तो पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे ज्याने पहिल्या डावात डबल सेंच्युरी आणि दुसऱ्या डावात दीड शतकापेक्षा जास्त धावा केल्या आहेत! एका कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने केला आहे, आणि जागतिक स्तरावर तो दुसऱ्या स्थानी आहे! इतकंच नाही तर इंग्लंडमधील केवळ चारच डावांत खेळूनही, तो भारतीय संघाकडून इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे! असे अनेक 'पहिले' आणि 'एकमेव' विक्रम त्याने केले आहेत, आणि हे करताना गिलने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांसारख्या भारतीय क्रिकेटमधील आपल्या वरिष्ठांनाही मागे टाकले आहे. त्याचबरोबर, त्याने स्टीव्ह स्मिथ, ग्रॅमी स्मिथ, ब्रायन लारा, कुमार संगकारा, क्रेग चॅपल आणि अशा अनेक दिग्गजांनाही मागे टाकले आहे. आणि हे सर्व त्याने अवघ्या पंचविशीत केले आहे, म्हणूनच मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे! एकीकडे ही कामगिरी त्याने केवळ एक फलंदाज म्हणून केली नाही, तर तो एका तरुण संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारीही सांभाळत होता — त्या संघाबद्दल तर मालिकेच्या सुरुवातीपूर्वीच सगळ्यांनी नकारात्मक अंदाज लावले होते आणि त्यांना या मालिकेतून आधीच बाद केलं होतं! भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद म्हणजे जणू 'गेम ऑफ थ्रोन्स' सारखं आहे. तुम्ही असा मुकुट परिधान करता आणि अशा सिंहासनावर बसता, ज्याला पंतप्रधानपदापेक्षाही जास्त आदर आणि प्रेम मिळतं. पण त्यासोबतच ती जबरदस्त किंमत आणि जबाबदारी घेऊन येते! ही किंमत म्हणजे दीडशे कोटी भारतीय नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणं- की तुम्ही कोणताही सामना खेळत असलात तरी तो जिंकायलाच हवा! आणि ही जबाबदारी इतकी मोठी असते की तिची कल्पनाही करता येणार नाही. कारण जर तुम्ही ही किंमत भरली नाही, तर भारतीय क्रिकेटमधील देवत्वाच्या (म्हणजे 'देव' समजल्या जाणाऱ्यांनाही) पातळीवर पोचलेली नावंसुद्धा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे स्टेडियममधून शिव्यांसह हाकलली गेली आहेत. आपल्या देशात क्रिकेटमध्ये अपयशाची शिक्षा ही इतकी कठोर असते!
आणि मग तुमची टीम (दुसऱ्या टेस्ट सामन्यात) उतरतेय, पहिला सामना जिंकल्यासारख्या स्थितीतून हरल्यानंतर! लक्षात ठेवा, कोणत्याही खेळात जिंकणं-हरणं हे असतंच, पण काही पराभव फार वेदना देतात — विशेषतः जेव्हा सामन्याच्या तिसर्या-चौथ्या टप्यात तुमची टीम जिंकत असते आणि शेवटी हरते. असा पराभव तुमचं मनोधैर्य तोडतो — एक खेळाडू म्हणून, एक माणूस म्हणून आणि कर्णधार म्हणूनसुद्धा! म्हणून गिलसमोर तीन मोठ्या जबाबदाऱ्या होत्या — पहिली म्हणजे त्या कडवट आणि वेदनादायक पराभवाला मागे टाकणं आणि स्वतःला एक वैयक्तिक खेळाडू म्हणून सावरून पुन्हा सज्ज करणं; दुसरी म्हणजे एक माणूस म्हणून नैराश्यावर मात करणं; आणि तिसरी, कर्णधार म्हणून स्वतःला आणि आपल्या उर्वरित दहा खेळाडूंना पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ देण्यासाठी उभं करणं. शिवाय, इंग्लंडमधील त्याची फलंदाजी सरासरी (गेल्या सामन्यातील शतक वगळता) त्याच्याच विरोधात होती — म्हणजेच ती समाधानकारक नव्हती! अरे हो, अजून एक गोष्ट होती, बुमराह (कृपया गुगल करा) जो तुमचा सर्वात प्रभावी शस्त्र मानला जातो आणि सध्या जगातील क्रमांक एकचा गोलंदाज आहे, तो ह्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. आणि कोणताही सामना जिंकायचा असेल, तर समोरच्या संघाला दोनदा बाद करावं लागतं — म्हणजे चक्क वीस विकेट्स घ्याव्या लागतात! कोणताही सामान्य माणूस एवढ्या मोठ्या एव्हरेस्टसारख्या संकटांच्या ओझ्याखाली दबून गेला असता किंवा हार मानली असती. पण असे पुरुष इतिहास लिहीत नाहीत. जे तुटत नाहीत, जे सर्वात मोठ्या संकटांना एक संधी मानतात, तेच इतिहास घडवतात. आणि गिलने तेच केलं, फक्त एकाच शाश्वत मार्गाने – म्हणजेच स्वतः अप्रतिम कामगिरी करून! मी टेस्ट क्रिकेटचा कट्टर (डायहार्ड फॅन) चाहता आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे या खेळातील संघर्ष आणि त्याचबरोबर समालोचकांकडून (त्यापैकी काही जण त्यांच्या काळातील खेळाचे दिग्गजही होते) तुम्हाला खेळाबद्दल (आणि जीवनाबद्दलही) ऐकायला मिळणारे विचार. आणि गिल खेळत असताना, खेळात वारंवार एक शब्द वापरला जात होता, तो म्हणजे "जिद्द किंवा निर्धार"(intent)! आजकाल आपल्याला कोणत्याही भाषेतील कोणत्याही शब्दाचा अर्थ आपल्या बोटांवर मिळतो (इंटरनेटचे आभार), पण “इंटेंट” सारख्या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, तो प्रत्यक्ष जगणाऱ्या व्यक्तीचा अनुभव घ्यावा लागतो, जे गिलने उदाहरणासह दाखवून दिलं. गिलचा इंटेंट काहीतरी सिद्ध करण्याचा नव्हता, तर जितका जास्त वेळ मैदानावर टिकून राहता येईल तितका राहणं, आणि स्वतःला मानसिक व शारीरिकदृष्ट्या न मोडता संपूर्ण संघाचं (आणि देशाचं) मनोधैर्य उंचावणं, हाच खरा उद्देश होता. हे संपूर्ण शेअरिंग म्हणजे गिलने दाखवलेल्या इंटेंटला दिलेली एक आदरांजली आहे. आणि या प्रवासात त्याने जे काही विक्रम (रेकॉर्ड म्हणून वाचा) मोडले, ते फक्त त्या इंटेंटचे परिणाम, म्हणजेच बाय-प्रॉडक्ट होते! आणि हो, हे लक्षात घ्या, पहिल्या टेस्टमध्येही गिलने शतक ठोकलं होतं, पण त्याचबरोबर संघातील आणखी चार फलंदाजांनीही शतकी खेळी केली होती. पण या दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र गिल एकमेव असा खेळाडू होता ज्याने दोन्ही डावांत शतक ठोकलं, आणि त्याचमुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आणि त्यांनीही आपापली मोलाची कामगिरी करून संघाच्या विजयात हातभार लावला. याने मला श्रीकृष्णाने आपल्या लहानशा बोटावर गोवर्धन पर्वत उचलल्याची गोष्ट आठवली, आणि तरीही त्यांनी असं भासवलं की जणू प्रत्येक गावकरीसुद्धा त्या शक्ती निर्माण करण्यात सहभागी होता. कारण खरा नेता तोच, जो आपल्या संघातील प्रत्येक सदस्याला असं वाटू देतो की ‘मीही या विजयाचा, या कामगिरीचा महत्त्वाचा भाग आहे.’ आणि हेच गिलने करून दाखवलं!
म्हणूनच गिलची ही दोन्ही खेळी इतकी महत्त्वाची वाटली, आणि त्यासाठीच मी सामना संपण्याच्या आधीच त्याला शब्दांमधून मानवंदना देण्यास सुरुवात केली, अगदी जशी की मागच्या वेळी संपूर्ण टीम इंडियासाठी केली होती. फरक इतकाच की, गिलने आपल्या अफाट प्रयत्नांनी हे जवळपास निश्चित करून टाकलं की भारत हा सामना हरणार नाही, अगदी एखादा चमत्कार घडलाच तरी! आणि आता जर सामना अनिर्णित राहिलाही, तरी तो इंग्लंडसाठी हरल्यासारखाच मानावा लागेल, कारण ही संपूर्ण परिस्थिती इंटेंट चा थेट परिणाम आहे! तुम्ही अशा दौऱ्यावर जाता जिथे तुम्हाला विजयाची कोणतीही संधी दिली जात नाही, आणि आपल्या खेळाचा अलीकडचा इतिहासही तेच सांगतो. मात्र, तुमचा संघ पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करतो आणि तरीही तुम्ही सामना गमावता. आणि मग, अक्षरशः एकट्याच्या बळावर, तुम्ही दुसरा सामना अशा पातळीवर घेऊन जाता की खेळातील सर्वोत्तम संघालाही त्यांच्या स्वतःच्या मैदानावर जिंकण्याची कोणतीही संधी नसते, उलट त्यांना सामना वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हीच त्या एका माणसाच्या इंटेंटची(निर्धार) ताकद आहे, आणि हाच माझ्या या साऱ्या मांडणीचा मूळ विषय आहे. आणि हे करताना, तुम्ही एक व्यक्ती म्हणूनही, आणि नेता म्हणूनही नैसर्गिकपणे घडत जाता. तुमचा सन्मान तुम्हाला दिलेल्या शस्त्रामुळे वा कॅप्टनपद मिळवल्याने होत नाही, तर ते शस्त्र, ते पद तुम्ही कसं वापरता त्यावरून होतो. आणि ही गोष्ट आपणा सर्वांवर लागू होते, आपल्या करिअरमध्ये, आयुष्यात… जसं तुम्ही म्हणाल, तसंच! ही मांडणी मी सर्वप्रथम स्वतःसाठी लिहून ठेवतोय, कारण विराट म्हणतो तसं, प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही तुमच्या आधीच्या आवृत्तीपेक्षा थोडं अधिक चांगलं व्हायला हवं. आणि कुणी दुसरा सुधरत जातोय, हे पाहूनसुद्धा आपण तेच करू शकतो, बरोबर ना? पण त्याहूनही जास्त, मी हे माझ्या मुलांसाठी आणि आजच्या पिढीसाठी लिहितोय, जे काहीतरी बनू इच्छितात, स्वतःला सिद्ध करू पाहतात. कारण यश मिळवण्यासाठी लागते ती सातत्याने केलेली प्रॅक्टिस, प्रचंड शिस्त, समर्पण, संयम, निर्धार आणि हो… फिटनेस सुद्धा! (कारण पाचपैकी जवळपास तीन दिवस मैदानावर खेळायचं असेल, तर शरीर आणि मन दोन्ही जबरदस्त तंदुरुस्त हवं) आणि हे सगळं एकत्र आलं… की मग यश मागावं लागत नाही, ते आपल्या पायाशी झुकतं. हेच गिलच्या खेळीने मला पुन्हा एकदा पटवून दिले! माझी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक तरुणाने गिलच्या या खेळी पाहाव्यात, त्यांच्याविषयी वाचावं — कारण या खेळी म्हणजे जणू आयुष्याचं एक उघड आणि मोफत वर्गच आहेत. या खेळीतून शिकता येतं की यशाच्या वाटेवर स्वतःला कसं घडवायचं, आणि आयुष्यात संकटं समोर आली की त्यांना सामोरं जाताना काय करायला हवं! अगदी खरं आहे! इतकं सगळं करून, मनापासून झगडूनही कदाचित विजय मिळणार नाही… पण एक गोष्ट नक्की मिळते, तुमच्या प्रयत्नांचा आदर, तोही भरपूर! आणि मिळतो तो आत्मविश्वास, जो कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, ना कुठल्या ऑनलाईन कोर्समध्ये मिळतो, तो तुम्ही स्वतःच्या मेहनतीनं कमावलेला असतो! शुभमन गिल, मनापासून धन्यवाद, आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःचं काम, हे तू तुझ्या खेळातून शिकवलंस. तू जे इतिहास घडवलास, त्यातून मी खूप काही शिकलो… आणि अधिक समृद्ध झालो. असंच खेळत रहा, नवनवीन इतिहास रचत राहा, हीच शुभेच्छा देत निरोप घेतो!
(ज्या क्षणी गिल इतिहास घडवत होता, त्या वेळेसच इंग्लंडमध्येच अजून एका तरुणाने, खरं तर एका लहानग्याने, इतिहासात आपलं नाव कोरलं! वैभव सूर्यवंशीने 14 व्या वर्षी अंडर-१९ क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावत हा पराक्रम केला आणि इतिहासाच्या शर्यतीत स्वतःची ठसठशीत नोंद केली.)
*तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, तोपर्यंत टीम इंडियाने विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे, दुसरी टेस्ट सगळ्यात मोठ्या फरकाने जिंकून, आणखी एक इतिहास घडला!! आणि मी त्याचा साक्षीदार होतो याचा मला आनंद आहे… आणि नक्कीच तुम्हालाही तो अनुभवायला मिळाला असेल! आणि हो तिसरी टेस्टपण खुप रंगतदार होऊन भारत शेवटच्या दिवशी हरला आहे!!
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा