क्रिकेट, भारत इंग्लंड टेस्ट मॅच आणि इतिहासाचा धडा!!
क्रिकेट, भारत इंग्लंड टेस्ट मॅच आणि इतिहासाचा धडा!!
“खेळामध्ये तुलना करून काहीही उपयोग नसतो, विशेषतः दोन युगांमध्ये व पिढ्यांमध्ये, कारण यामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या दर्जापासून ते खेळासाठीचे वातावरण यासारखे अनेक वेगवेगळे घटक विचारात घ्यावे लागतात’…
“एखादा क्रिकेटपटू
किती महान आहे याचे मोजमाप त्याने किती शतके केली आहे यावरून होत नाही, तर त्याने खेळावर केलेल्या परिणामावरून होते” …
… सुनील गावस्कर
मी, हा लेख लिहीण्यास सुरुवात केली तेव्हा भारतीय संघाने अनेक प्रकारे इतिहास रचला होता व जेव्हा विषय क्रिकेट असतो तेव्हा वरील दोन्ही अवतरणे ज्यांची आहेत त्यांच्याशिवाय या लेखासाठी आघाडीचा खेळाडू म्हणून दुसरे कोण असू शकते! मी सुनील गावस्कर यांच्याविषयी बोलतो आहे व तुम्हाला या नावाची ओळख हवी असेल तर तुम्ही लेखाचे वाचन इथेच थांबवू शकता व इन्स्टाग्रामवर फनी (म्हणजे मूर्खपणा) रिल्स पाहू शकता (उपरोधिक बोलतोय). असे पाहिले तर दररोज काही ना काही इतिहास रचला जात असतो कारण गेला दिवस हा इतिहासच असतो (मास्टर उग्वे, kung fu panda, कृपया गूगल करा) परंतु तुम्ही जेव्हा म्हणता की इतिहास घडवला गेला किंवा इतिहास लिहीला गेला तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की काहीतरी महान झाले, काहीतरी संस्मरणीय घडले ज्याचा केवळ दुसऱ्या दिवशीच नव्हे तर दीर्घकाळ उल्लेख केला जाईल किंवा त्याविषयी बोलले जाईल, कारण ते दररोज घडत नाही. मला खेळ खुप आवडतात, मी स्वतःला खेळाडू समजतो कारण मी अजूनही नियमितपणे बॅडमिंटन खेळतो व मला खेळ पाहायला आवडतात, त्याविषयी वाचायला आवडते व इथे मी खेळाच्या इतिहासाविषयी बोलतोय. आपल्या महाकाय देशामध्ये क्रिकेट हा एक धर्मच आहे, मला कसोटी क्रिकेट अधिक आवडते कारण इतर कोणत्याही खेळापेक्षा त्यासाठी अधिक संयम, निर्धार व सराव लागतो, कारण कोणत्याही खेळामध्ये सामना सलग पाच दिवस चालत नाही (म्हणजे ताणला जात नाही)! सायकल मध्ये टूर डी फ्रान्ससारख्या स्पर्धा आहेत, परंतु त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की तो नेहमीसारखा खेळ नाही, मी खेळांविषयी बोलतो आहे व त्यापैकी बहुतेक चार ते पाच तासात संपतात, तेदेखील टेनिसचा सामना अगदी पाच सेटपर्यंत लांबला तर. याचे कारण म्हणजे लोकांचा संयम दिवसेंदिवस कमी होत चालला आहे व क्रिकेटमध्येही दिवसेंदिवस लोकांचा कल छोट्या स्वरूपाच्या सामन्यांकडे म्हणजे टी२० कडे वाढत चालला आहे, ज्यामध्ये सामना जास्तीत जास्त चार तासात संपतो. या पार्श्वभूमीवर सलग पाच दिवस टीव्हीसमोर बसण्याचा किंवा स्टेडियममध्ये जाऊन दररोज दिवसात सात तास सामना पाहण्याचा संयम कुणाकडे आहे, नाही का? तुम्हाला कोणत्याही खेळाचे सार समजले असेल तर तेच खेळाचे सर्वोत्तम स्वरूप आहे, असे मी कसोटी क्रिकेट या प्रकाराविषयी म्हणेन.
तर इतिहास घडवण्याविषयी सांगायचे तर हे भारत-इंग्लंडदरम्यान अलिकडेच सुरू झालेल्या कसोटी मालिकेविषयी आहे, त्यातला पहिला सामना हा आजपर्यंत (मी लेख लिहीपर्यंत) सुरू होता. परंतु त्याआधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, मी हा लेख कुणाही खेळाडूच्या कामगिरीवर किंवा चांगल्या गोष्टींवर किंवा कोणत्याही संघाच्या चुकांवर टीका करण्यासाठी लिहीत नाही. कारण एक म्हणजे मला तसे करण्याचा काही एक अधिकार नाही किंवा नैतिक हक्क नाही. प्रत्येक खेळाडू मैदानावर जेव्हा खेळत असतो, विशेषतः जेव्हा तो एखाद्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्याची शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो (केवळ तो भ्रष्ट असेल तरच याला अपवाद असतो), वाईट कामगिरी कुणीही जाणीवपूर्वक करत नाही असा विश्वास मला वाटतो. त्याचप्रमाणे भारतात लाखो खेळाडू त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात व त्यापैकी फक्त अकरा जणांना भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळण्याची संधी मिळते, त्यामुळेच त्यांच्या (किंबहुना कुणाच्याही) क्षमतेविषयी शंका घेण्याचा मला हक्क नाही. आपल्या लोकशाही देशामध्ये तुम्ही तुमच्या मतप्रदर्शनातून कुणावरही हल्ला करू शकता. जेव्हा चित्रपट, क्रिकेट व राजकारण हे विषय असतात तेव्हा आपल्याकडे अक्षरशः लाखो तज्ज्ञ असतात व मला त्या गर्दीचा एक भाग व्हायचे नाही. त्यामुळे एखाद्या खेळाडूच्या खराब कामगिरीवर टीका करणे किंवा त्यावर बोट ठेवणे हा या लेखाचा उद्देश नाही, तरीही एक गोष्ट उरतेच, चूक ही चूक असते व तुम्हाला तसेच संघाला त्याला किंमत मोजावी लागते, सांघिक खेळामध्ये हा पैलू महत्त्वाचा असतो, कारण अकरा लोकांचा संघ हा खेळ खेळत असतो. खेळातून इतिहास घडवण्याच्या महत्त्वाची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी तसे आयुष्याचे धडे शिकण्यासाठी हा लेख आहे, जे हा इतिहास घडत असताना पाहताना व त्याचा अभ्यास करताना तुम्हाला मिळतीलच (त्यातून काय शिकायचे किंवा शिकायचे नाही हा तुमचा निर्णय असेल), त्याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहता येईल; अशा संधी दुर्मिळ असतात!
अलिकडेच जो इतिहास
घडला त्याचे महत्त्व विषद करण्यापूर्वी तुम्हाला आधी थोडक्यात त्याची कल्पना देतो.
पहिल्या भारतीय क्रिकेट संघाने जवळपास शंभर पूर्वी म्हणजे १९११ साली इंग्लंडचा
पहिला दौरा केला होता. त्या काळात भारतावर इंग्रजांचे राज्य असले तरीही, भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा
भाग नव्हता, त्याला वेगळा संघ
म्हणून मान्यता होती. स्वातंत्र्योत्तर काळात, पहिल्या अधिकृत भारतीय क्रिक्रेट संघाने १९५२ साली
इंग्लंडचा दौरा केला होता, म्हणजे त्याला
जवळपास त्र्याहत्तर वर्षे होऊन गेली, ठीक आहे? ही पार्श्वभूमी
जाणून घेतल्यानंतर, या त्र्याहत्तर
वर्षांमध्ये कुठल्याही भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन एकाच कसोटी सामन्यामध्ये
पाच शतके केली नव्हती जी या संघाने केली. ऋषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला,
ज्याने इंग्लंडच्या कसोटी सामान्याच्या दोन्ही
डावांमध्ये शतके केली. त्याचसोबत, आपल्या क्रिकेट
संघाचा कप्तान शुभमन गिल, उप-कप्तान ऋषभ
पंत या दोघांनीही पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शतके केली, जे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ
दुसऱ्यांदाच घडले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले की कप्तान व
उप-कप्तान म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी पार पाडत असलेल्या दोन्ही खेळांडूनी शतके
केली आहेत. ही ऐतिहासिक कामगिरी केवळ इथपर्यंतच मर्यादित नव्हती, तर जसप्रित बुमरा हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या
इतिहासामधील सर्वाधिक वेगाने पाच गडी बाद करणारा पहिला खेळाडू ठरला व भारताचा हा
संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया अर्थातच एसईएनए
देशांपैकी एकामध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये एका दिवसात सर्वाधिक
धावा करण्याचा करण्याचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर होता. ही सगळी कामगिरी
ज्येष्ठ खेळाडू एकाचवेळी निवृत्त झाले असताना व गेल्या आठ कसोटी क्रिकेट
सामन्यांमध्ये भारताचा प्रतिस्पर्ध्यांकडून अतिशय दारूण पराभव झालेला असताना करून
दाखवण्यात आली. प्रत्येकाला असे वाटले हा तरूण संघ इंग्लंडमध्ये कसा खेळेल कारण
विशेषतः आपल्यासारख्या उपखंडीय देशातून येणाऱ्या कोणत्याही संघासाठी इथल्या
हवामानाची स्थिती आव्हानात्मक असते. या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय संघाने जी
कामगिरी करून दाखवली ती निश्चितपणे ऐतिहासिकच म्हणावी लागेल!
पण हा इतिहास
इथेच संपत नाही, खरी गंमत तर पुढे
आहे, एवढी ऐतिहासिक कामगिरी
करूनही (मी त्याविषयीची माझी मते नंतर मांडेन) भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या या
कसोटी सामन्याच्या शेवटच्या हरला जो पुन्हा एक इतिहासच आहे! कारण, कसोटी क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात, इतर कोणत्याही संघाने एका सामन्यात पाच शतके
केल्यानंतरही हरल्याची नोंद नाही, हेच माझ्या
लेखाचे सार आहे. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे भारतीय संघाच्या पराभवाविषयी व
त्रुटींविषयी चर्चा झाली, ती होणे
स्वाभाविकच आहे कारण प्रत्येक पराभवासोबत टीकाकार सुद्धा येतात व विशेषतः जेव्हा
तुमच्या हातातोंडाशी आलेला विजय तुम्ही गमवता तेव्हा, “भाई कुछ तो लोग कहेंगे ना”! परंतु मी नमूद केल्याप्रमाणे मी
हा लेख भारतीय संघावर टीका करण्यासाठी लिहीत नाही, तर त्यांनी पहिल्या चार दिवसात जे करून दाखवले त्याचे कौतुक
करण्यासाठी लिहीतोय, जेव्हा त्यांनी
सामना जवळपास आपल्या नावे करून टाकला होता. हा असा संघ आहे ज्याच्या कामगिरीविषयी
प्रत्येकाला शंका होती, हा संघ अननुभवी
होता (ज्याची किंमत त्यांना शेवटी मोजावी लागली), अगदी पहिला चेंडू टाकला जाण्यापूर्वी ज्यांच्याकडे संभाव्य
पराभूत संघ म्हणून पाहिले जात होते, त्या संघाने त्यांच्या वरिष्ठांपैकी कधीही कुणीही करून न दाखवलेली कामगिरी
करून दाखवली. तुम्ही कल्पना करू शकता का गिल, पंत, जयस्वाल, केएल राहुल, बुमरा यांनी त्यांच्या ज्येष्ठांनाही मात दिली आहे
ज्यामध्ये विजय हजारे, सुनिल गावस्कर,
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड,
कपिल देव, अनिल कुंबळे, आर अश्विन, विराट कोहली,
रोहित शर्मा व महान महेंद्रसिंह धोनी व इतरही
अनेक खेळाडूंचा समावेश आहे. ही किती छान भावना आहे नाही का, परंतु विरोधाभास म्हणजे त्यानंतरही ते सामना हरले, इतिहासामध्ये गुण तालिका पाहताना पहिल्या कसोटी
सामन्यातील पराभूत संघ म्हणूनच या भारतीय संघाचेच नाव लिहीले जाईल, ते देखील ऐतिहासिकपणे!
पराभवाचे विश्लेषण केले जाईल, आपल्यापेक्षाही भारतीय संघ व व्यवस्थापन ते करण्यात व्यग्र असेल, मग ते सोडलेले झेल असोत, फलंदाजांची शेवटची फळी कोसळणे असो किंवा बहुतेक गोलंदाजांनी केलेली चुकीच्या लाइनवर गोलंदाजी असो, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाईल, तरीही यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे पहिल्या चार दिवसात जी कामगिरी झाली ती पुसली जाणार नाही. ती कामगिरी पाहणे अभिमानास्पद होते व लक्षात ठेवण्यासारखे होते, हा माझ्या लेखाचा हेतू आहे.
आयुष्यही आपल्यापुढे आव्हाने निर्माण करत असते व
त्या आव्हानांना आपण कसे सामोरे जाते यावरून आपली व्याख्या ठरत असते, त्याचवेळी आपण ऐतिहासिक कामगिरी करूनही,
सर्वोत्तम देऊनही तो आपल्याला जिंकण्यासाठी
पुरेसा नसतो; आपला पराभव होऊ
शकतो, पण काही हरकत नाही. आपण
या एका सामन्याच्या निकालापेक्षाही बरेच मोठे काहीतरी जिंकले आहे ते म्हणजे नवीन
उज्ज्वल इतिहास घडविण्याचा आत्मविश्वास. त्या हरलेल्या कसोटी सामन्यातून हे
घेण्यासारखे आहे असे मला वाटते, हे एकूणच
ऐतिहासिक आहे. या कसोटी सामन्यामुळे मला (तसेच खेळाडूंनाही) काही गोष्टींची जाणीव
झाली ज्या आपल्या कामाला व जीवनालाही लागू होतात. प्रसिद्ध कृष्णा व सिराज यासारखे
गोलंदाज जेमतेम आठवडाभरापूर्वी आयपीएलमध्ये (कृपया गूगल करा) अत्यंत यशस्वी झाले
होते ते या सामन्याच्या दोन्ही डावांमधील जवळपास ८५० हून अधिक धावा रोखू शकले
नाहीत. यातून मी आणखी एक धडा शिकलो की खेळाच्या एका स्वरूपात यश मिळाले म्हणजे
त्या खेळाच्या दुसऱ्या स्वरूपात यश मिळेलच असे नाही, हे तत्व बिझनेसलाही लागू होते. त्याचवेळी झेल सोडणेही
आपल्याला अतिशय महागात पडले व ते देखील शतक करणाऱ्या खेळाडूकडून, यातून आणखी एक धडा शिकण्यासारखा होता, तो म्हणजे तुम्ही एका भूमिकेमध्ये यशस्वी ठरला
तरीही तुम्ही दुसऱ्या भूमिकेमध्ये चुका करू शकता जे तुमच्या संघाला महागात पडू
शकते. म्हणूनच खेळताना किंवा काम करताना तुम्ही प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडली
पाहिजे (यशस्वी व ऋषभ यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे)! तुम्ही एखादी चूक
जाणीवपूर्वक करत नसलात तरीही संघाला त्याची किंमत मोजावी लागते. या सामन्याची इतिहासात नोंद केली जाईलच मात्र
मला त्यातून अनेक धडेही मिळाले, एक म्हणजे भारतीय
संघाच्या फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करूनही गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामुळे आपला
पराभव झाला. म्हणून कसोटी सामन्यासारख्या सांघिक खेळामध्ये काही खेळाडू कितीही
सशक्त असले तरीही सामना जिंकण्यासाठी तुम्हाला संपूर्ण संघाच्या प्रयत्नांची गरज
असते, हा त्यातील महत्वाचा धडा!
मला खात्री आहे की भारतीय संघानेही यातून योग्य तो धडा घेतला असेल कारण हा तरूण
संघ आहे व त्यांना अजून पुढे बरेच क्रिकेट खेळायचे आहे.
इतिहासाविषयी
बोलायचे झाले, तर इतिहास हा
कधीही चांगला किंवा वाईट नसतो, त्यामध्ये केवळ
घडलेल्या घटनांची तथ्ये नोंदवलेली असतात. आपल्याला तो इतिहास चांगला वाटतो किंवा
वाईट वाटतो हे आपण रेषेच्या कोणत्या बाजूला उभे आहोत यावर अवलंबून असते. म्हणजे या सामन्याच्या वेळी पहिले चार दिवस
आपला संघ ज्या इतिहासाचा भाग होता त्याविषयी आपल्याला चांगले वाटत होते (म्हणजे
भारी वाटत होते), परंतु शेवटच्या
दिवशी आपल्याला त्याच इतिहासाविषयी वाईट वाटायला लागले कारण हा सामना आपण हरलो! या
सगळ्या गोष्टींमुळे मला हा खेळ किती सुंदर आहे याची जाणीव झाली. सरतेशेवटी मी फक्त
कसोटी क्रिकेटचे आभार मानेन, कारण केवळ हा सामना पाहून एक खेळाडू म्हणून,
एका संघाचा भाग म्हणून व तसेच एक व्यक्ती
म्हणून स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा मला संधी दिली; भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा कारण “पिच्चर
अभी बाकी है मेरे दोस्त”!
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा